बँकांनी पीककर्ज वितरणाची उद्दिष्टपुर्ती करावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. २४, (जि. मा. का.) : पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी 2 हजार 595 कोटीचे
असून यामध्ये रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 1 हजार 97 कोटी 50 लाखाचे आहे. यामध्ये
फेब्रुवारी अखेर खरीपासाठी 1387 कोटी 77 लाख रूपये तर रब्बीसाठी 369 कोटी 15 लाख रूपये पीक कर्ज
वितरण झाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत खरीपाचे 93 टक्के तर रब्बीचे 34 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. रब्बीचे
पीक कर्जाचे वितरण तुलनेने कमी असून याचा सविस्तर आढावा घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
यांनी बँकांनी पीक कर्ज वितरणाची उद्दिष्टपूर्ती करावी असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी प्राधान्य क्षेत्रांसाठीही
बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.
जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. व्ही. जाधव,
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. बेळगी
यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून सर्वसामान्यांचे
जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या योजनांना बँकांनी स्वयंस्फूर्तीने, विनाविलंब आणि
सुलभतेने पतपुरवठा करावा. प्रत्येक शेतकरी किसान क्रेडिट कार्डधारक असावा. जिल्ह्यात डिसेंबर 2020 अखेर
1 लाख 84 हजार 967 शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. स्वयंरोजगाराला
चालना देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, जी उद्योग प्रकरणे मंजुर झाली आहेत अशांना लवकरात
लवकर वित्त पुरवठा करावा असे आदेशित केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी एसएचजी बँक लिंकेज, सुवर्णजयंती ग्राम
स्वरोजगार योजना, सुवर्णजयंती शहरी स्वरोजगार योजना, पीएमईजीपी योजना, लिडकॉम तसेचविविध
महामंडळाकडील योजनांचा आढावा घेतला.
No comments