Header Ads

Header ADS

*जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होण्यासाठी तपासण्या वाढवून ऑनलाइन नोंदी घ्याव्यात* - *जिल्हाधिकारी दौलत देसाई*


◆ *जिल्ह्यात 15 हजारांहून अधिक तपासण्या होत असल्याबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक*
◆ *डाटा एन्ट्रीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे*
◆ *कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करा*
◆ *या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा*

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होण्यासाठी तपासण्या वाढवून नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करावे. तसेच झालेल्या तपासण्यांची माहिती तात्काळ ऑनलाइन भरावी, अशा सूचना देऊन या कामी हलगर्जीपणा होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

जिल्ह्यातील कोविड-19 प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या, ऑनलाइन माहिती भरणे, संपर्क शोध आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृष्य प्रणालीव्दारे बैठक  घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी.एन. देवकर,  आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले.

  जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दररोज 15 हजारांहून अधिक तपासण्या होताहेत, याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करुन शहरासह ग्रामीण भागात तपासण्यांची संख्या वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा. त्या त्या भागासाठी देण्यात आलेल्या 'टेस्टिंग किट्स' मधून आतापर्यंत झालेल्या तपासण्यांच्या नोंदी व शिल्लक किट्स ची माहिती वेळोवेळी सादर करा. जिल्ह्याचा ‘पॉझिटीव्हिटी रेट’ कमी होण्यासाठी संबंधित तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न. पा. मुख्याधिकारी यांनी ‘सूक्ष्म नियोजन’ करुन समन्वयाने काम करावे. अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या करुन घेऊन 'डाटा एन्ट्री' करावी. या कामासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करुन द्यावे. तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीचे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) प्रमाण वाढवावे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले. 

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

बैठकीला उपजिल्हाधिकारी सर्वश्री हेमंत निकम, अश्विनी सोनवणे- जिरंगे आदी उपस्थित होते.
000000

No comments