जिल्ह्यात आजअखेर 535 पाणी पुरवठा योजना पुर्ववत सुरु मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची माहिती
कोल्हापूर, दि. 3 : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माहे जुलैच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला होता. महापूर व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकुण 630 पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजना वेगवेगळ्या कारणामुळे 23 जुलै पासून बंद पडल्या होत्या. यापैकी आज दि. 3 ऑगस्ट अखेर 535 योजना पुर्ववत सुरु होवून गावांमध्ये पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा, राधानगरी व चंदगड या सहा तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा योजना सुरु झाल्या आहेत. बंद असलेल्या 95 योजनांपैकी 42 योजनांचे पॅनेल बोर्ड पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. तसेच 53 योजना विद्युत पोल पडल्याने तारा विस्कळीत होवून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने बंद आहेत. यात प्रामुख्याने शिरोळ, हातकणंगले, करवीर व शाहुवाडी तालुक्यातील योजनांचा समावेश आहे. पुराचे पाणी ओसरताच विद्युत वितरण कंपनीमार्फत योजना दुरुस्त करून घेवून पुर्ववत सुरु करण्याची दक्षता घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी कळविले आहे.
000000000
No comments