1999 मध्ये शरद पवारांच्या पाठीशी राहिले कोल्हापुरातील दिग्गज
कोल्हापूर ः जालंदर पाटील
शरद पवार, पी. ए. संगम, तारिक अन्वर या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून परदेशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास विरोध दर्शविला.
10 जून 1999 मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आपल्या शिलेदारांच्या सहकार्याने राष्ट्रवादीची स्थापना करून वेगळी चूल मांडली. त्यावेळी पवार यांना मानणारा मोठा गट काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झाला. निष्ठावंत काँग्रेस नेते व कार्यकर्ते मात्र काँग्रेस पक्षासोबत कायम राहिले.
कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नव्हता. पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर सदाशिवराव मंडलिक, हसन मुश्रीफ, बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब पाटील, निवेदिता माने, के. पी. पाटील, आर. के. पोवार, ए. वाय. पाटील, अशोकराव जांभळे, नामदेवराव भोईटे आदी दिग्गज नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीत सामील झाले. बाबासाहेब कुपेकर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी व आर. के. पोवार यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
पहिल्याच प्रयत्नात खासदारकी आणि मंत्रीपदाची संधी
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी मतदारसंघातून सदाशिवराव मंडलिक आणि निवेदिता माने यांनी लोकसभा निवडणूक लढविली आणि विजय मिळवीत हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळविला आणि त्यांना कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. कोल्हापूरला राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रथमच तीन मंत्रीपदे मिळाली.
No comments