अनेकांचं राजकीय नेतृत्व तयार करणाऱ्या राजन पाटील यांचं कर्तृत्व आणि वर्चस्व आजही निर्विवादच..
*सादगीमे हि जिंदगी तत्वाने राजकीय वाटचाल
विरोधकांनाही प्रेरणादायी..*
आज आज ४ जुलै म्हणजे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांचा वाढदिवस.. तीन टर्म आमदारकी भूषवून मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतरच्या नंतरच्या तिसऱ्या टर्मला देखील पक्षाचाच उमेदवार निवडून देणारे किंगमेकर म्हणजे राजन पाटील.. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूच इतके आहेत की त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व विविधांगी बनले.. वडिलांना एकुलते एक असूनही लोकनेते अण्णांच्या कडक शिस्तीचं बाळकडू त्यांना मिळालं.. तर मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या मृदू स्वभावातील प्रामाणिकपणाची शिकवण आणि लोकांप्रती आपुलकीची वागणुकीचा वसा त्यांनी आपल्या आईकडून घेतला.. त्यामुळे आजही कधी कधी ते जरी कोणावर रागावले तरी नंतर ती व्यक्ती भेटल्यावर त्याच्या बद्दलचा राग विसरून खांद्यावर हात ठेवून त्याची मायेने विचारपूस करायचा त्यांचा स्वभाव.. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अजातशत्रू राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून राजन पाटील यांच्याकडे पाहिले जाते.. विरोधी पक्षातही त्यांच्या स्वभावाबद्दल नेहमीच चर्चा असते. त्यांना सहसा विनाकारण आडव कोणी जात नाही. अथवा त्यांना दुखवावं असं कोणत्याही विरोधी पक्षाला वाटत नाही. मात्र त्यांच्याच पक्षातल्या अनेकांनी त्यांना वेळोवेळी चुचकारण्याचा आव्हान देण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला.. पाटलांचं बोट धरून जे राजकारण शिकले तेच त्यांच्याकडे बोट करून जेव्हा जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्या विद्वान उपनेत्यांबद्दल गालातल्या गालात सुचक हास्य दाखवत काहीही प्रतिक्रिया न देता समयसूचकता आणि संयम हा अविभाज्य गुण त्यांनी सर्वांसमोर ठेवला.. त्यामुळेच त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कितीजण पक्षात आले आणि किती जण पक्ष सोडून गेले तरीही त्यांचा मतदारसंघातील राष्ट्रवादी हा पक्ष अभेद्यच राहिला..विरोधकांची संख्या मोजण्यापेक्षा सोबत असणाऱ्या पक्षभेदीना त्यांनी अचूक ओळखलं.. मोहोळ शहरातील राजकारणाबद्दलही त्यांनी अद्वितीय धोरण स्वीकारत नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणं पसंत केलं.. चार मतही मागे नसणारे पत्रपंडित लोकच राजकारणाच्या चार ओळी लिहून तत्त्वज्ञान सांगतात ही बाब त्यांना यापूर्वीच लक्षात आली.मालकांना विरोध करूनही निवडणुकीचा गुलाल घरातल्या घरात अंगावर उधळून सकाळी अनगरला येणाऱ्या व्यवहारिक निष्ठेच्या लोकांची स्वतंत्र यादी त्यांनी मनोमन जपली.. विरोधक असणारे मात्र प्रांजळ राजकारण करणारे परके आपल्याबद्दल सुयश चिंततात मात्र आपल्यातीलच काही समर्थक म्हणवून घेणारे आपल्या राजकारणाच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त करतात या नाराजीची सल त्यांनी सदैव मनात जपली ती कोणीही आपल्यापासून मनाने तुटू नये म्हणून..आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबवत्सल असणारे मालकांना सर्वजण दादा जरी म्हणत असले तरी अंतर्गत नाती त्यांनी अत्यंत हळवेपणाने जपली.. नवी नाती काळाच्या ओघात जोडली जात असताना जुन्या नात्यांना यापूर्वी दिला जाणारा वेळ त्यांनी सदैव राखीवच ठेवला.. त्यामुळेच लोकनेते अण्णा आणि मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या निधनानंतरही सर्व जुन्या स्नेह्यांना अनगरच्या पाटील वाड्याबद्दलची ओढ सदैव म्हणजे आजतागायत कायम राहिली.. एखाद्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर तब्बल वर्ष दीड वर्षानंतरही तो मुलगा अथवा ती मुलगी तिच्या त्याच्या वडिलांसोबत भेटली की कसं चाललंय बाळा तुझं बरे आहेत ना सगळे..? असा विचारलेला आपुलकीचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आदरभाव जपणारा ठरला.. म्हणून आजही मालकांचं अनगर आणि बारा वाड्यावर तितकंच लक्ष आहे याची खूणगाठ मनाशी प्रत्येक जण बांधताना दिसतो..
पक्षीय राजकारणात बाबतही अत्यंत अचूक निर्णय त्यांनी वेळोवेळी घेतले..गेली काही वर्षे भाजप -शिवसेनेची सत्ता असताना मोहोळ सारखा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ताब्यात असावा अशी इच्छा जितकी शिवसेनेला झाली इतकीच भाजपलाही. त्यासाठी राजकीय व्यूहरचना देखील आखली गेली. सुरुवातीला शिवसेनेच्या वाट्याला असणारा हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला घेण्याचाही हालचाली झाल्या. त्यासाठी भाजपचे तत्कालीन श्रेष्ठींनी राजन पाटील यांना पक्ष प्रवेशाचे खुले आमंत्रण दिले. तरीही पक्षासाठी निष्ठेचा अजोड मापदंड ठरलेल्या राजन पाटील यांनी भाजपच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिवसेनेच्या कोणत्याही दडपशाही आणि राजकीय धाकाला शरण न जाता राष्ट्रवादी सोबतच राहणे बाणेदारपणे पसंत केले. याची मोठी किमंत त्यांना नक्षत्र सारख्या प्रकरणात गोवले जाऊन मोजावी लागली. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जिल्ह्यातील इतर नेत्यांनीही पक्षश्रेष्ठींना राजन पाटील यांना पक्षात आणल्यास आजूबाजूचे दोन-तीन मतदारसंघ सोपे जातील असा सल्ला दिला. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ माईंड नेत्यांनी लोकनेते कारखान्या वरील कारवाईचा फास आणखी आवळला. एकीकडे भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विमानतळावरील स्वागताला पुष्पहाराची फुले सुकेपर्यंत तासन तास ताटकळत उभे राहणारे राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षाचे नेते भाजप सेने मध्ये जाण्यासाठी सत्तातुर झाले होते. जिल्ह्यातील साहेबांच्या जवळचे असलेले अनेक मित्र पक्षाचे नेते आपापल्या जागा राखण्यासाठी सोयीने भाजप शिवसेनेमध्ये दाखल देखील झाले. तरीदेखील राष्ट्रवादी सोबत राहणे पसंत करत राजन पाटील यांनी आणि अनगर सोडले नाही त्यामुळे भाजपचे मोहोळ मधील मिशन लोटस फेल गेले.गत तीन टर्मचा विधानसभा कालावधीत भिमाच्या निवडणुकीत धनंजय महाडिक विरोधात गेले. लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम ही विरोधात गेले. नंतरच्या कालावधीत याशिवाय राजन पाटील यांना व्यक्तिगत विरोध करणारे मात्र राष्ट्रवादी सोबत असलेले राजन पाटील यांनी विविध पदावर संधी दिलेले होते नव्हते ते बहुतांश देखील विरोधात गेले. घर फिरले की घराचे वासेही फिरतात याचा अत्यंत कटू अनुभव नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेला राजन पाटील यांना आला. ज्यांच्या साठी पाटील यांनी आणि पक्षाने खूप काही केले तीच मंडळी राजन पाटील यांच्या पराभवाची पर्यायाने राष्ट्रवादीच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत होते. अशा कालावधीत राजन पाटील यांनी कधी साधा रस्ता, साधी विहीर किंवा एखादं शासन दरबारी काम देखील केले नाही त्या मंडळींनी त्यांना साथ दिली. केवळ राजन पाटील यांच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वपक्षीय मंडळींनी राजन पाटील संकटात आहेत या भावनेने भरभरून मतं दिली तोच त्यांच्या विजयाचा केंद्रबिंदू ठरला.
राष्ट्रवादीसोबत अत्यंत वाईट काळात राहूनही पक्षाने त्यांच्यापेक्षा राज्यातील कनिष्ठांना कमी कामगिरीच्या बऱ्याच जणांना पुनर्वसन करत आमदारकी बहाल केली. मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या विराट सभेसमोर भाषण करणाऱ्या पक्षातील श्रेष्ठींना राजन पाटलांच्या पुनर्वसनाचा काळानुरूप सोयीने विसर पडला अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. ज्या सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य दिल्याने ते खासदार होऊन केंद्रीय गृहमंत्री झाले. ढोबळें हक्काच्या मतदारसंघात आणून आमदार करून त्यांना पाणीपुरवठामंत्री केलं. शिवाय रमेश कदम यशवंत माने यांच्या सारख्या नवख्यांनाही निवडून आणत आमदारकी दिली. त्यामुळे अनेकांचे नेतृत्व अगदी लीलया साकारत स्वतःचे कर्तृत्व दाखवणाऱ्या राजन पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी वरिष्ठ पक्षश्रेष्ठी कधी मनाचं दातृत्व दाखवणार? हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात घर करून आहे.. मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतरही मतदार संघातील मतदार बांधवांनी त्यांनी प्रचार केलेला उमेदवार निवडून देऊन त्यांना जणू परमनंट आमदार ठरवले.हे यश देखील त्यांच्या संपूर्ण जीवनातील एक अविभाज्य घटक बनले आहे हे मात्र नक्की.. अशा आमदार राजन पाटील यांचा आज वाढदिवस.. या पुढील काळातही त्यांच्या हातून तालुक्याच्या विकासासाठी मोठं कार्य होत राहो.. त्यांनी कुटुंबासारखा जपलेला हा मतदारसंघ त्यांच्या नेतृत्वाखाली सदैव विकासाची वाटचाल करीत राहो याच त्यांच्या वाढदिनी शब्द शुभेच्छा.. 🙏🏻🙏🏻💐💐
*महेश माने..
*9881323292-9623977399*
No comments